Friday, March 13, 2015

लग्न म्हणजे नेमकं काय?...भाग -1

लहानपणी अनेकदा लग्न हा शब्द ऐकून नेहमी मला प्रश्न पडायचा, "लग्न म्हणजे नेमकं काय? " मग घरातल्या मोठ्या माणसांना विचारल्यास एकच उत्तर मिळायचे, "अजून लहान आहेस. योग्य वेळी कळेल."
हळूहळू मग यावर विश्वास बसला की लग्न या प्रकरणासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागेल.  मग पुन्हा मधेच  वाटायचे कधी येणार ही योग्य वेळ?  जसं मोठं होण्याची घाई वाटू लागली.
 यानंतर मधे बराच काळ लोटला अन् अचानक एक दिवस घरात लग्न या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. आईची बाबांच्या  कानी कुजबुज सुरू झाली, "अहो लग्नाचं वय झालं आता, काहीतरी हालचाल  सुरू करावी लागेल."स्वारी खुश झाली कारण आता योग्य वेळ आली होती.
आतापर्यंत अनेक कथा कादंबर्‍यांमध्ये वाचलं होतं, लग्न म्हणजे दोन अनोळखी माणसांबरोबरच दोन परिवारात तयार होणारं एक सुंदर नातं...
आणि मग वर वरसंशोधनाची प्रकिया सुरू झाली. जे काही समज होते लग्नाबद्दल त्याचं गैरसमज आणि प्रश्नांत कधी रूपांतर झालं ते कळलं नाही.
तुकाराम सांगून ठेवले आहे,
"ऊस गोंडा परि रस नोहे गोंडा
काय भुललासी वरलिया रंगा"
(मतितार्थ-: ऊस वाकडातिकडा दिसत असला तरी त्याचा रस फार गोड असतो.)
इथे या ऊक्तीची आठवण झाली हे सांगण्याकरिता की बाह्यरूपावर भुलून जाऊ नये. माझंही तेच झालं लग्नाच्याबाबतीत. वरवर पाहता छान, सुंदर आणि सहज वाटणारी ही गोष्ट फारच गुंतागुंतीची आहे हे कळायला वेळ नाही लागला.
पण आज खरंच पुन्हा एकदा हा प्रश्न पडलाय, "लग्न म्हणजे नेमकं काय?" तोही अगदी लग्नाचं वय झाल्यावर...
अनेकांच्या मते माझं लग्नाचं वय उलटून चाललंय कारण माझ्या वयाच्या जवळजवळ सगळ्याच मुलींची लग्ने झाली आहेत.काहींना तर अपत्य प्राप्तीही झालीये.
पण मला कळत नाहीये अजूनही की फक्त मलाच हा प्रश्न सतावतोय की माझ्याबरोबरच माझ्यासारख्या अनेकांना... 
पण ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना तरी गवसलंय का या प्रश्नाचं उत्तर?
वर्तमानपत्रातील एखादी जाहिरात वाचा किंवा  matrimonial site वरील एखादं प्रोफाईल पहा, खालील वर्णन वाचायला मिळेल:
" उंची : ---, गोरी, सुंदर, सुशिक्षित, सुसंस्कारी, सडपातळ,  गृहकृत्यदक्ष, ..."
या तर झाल्या सर्वसाधारण अपेक्षा पण " व्यक्ती तितक्या प्रकृती" या ऊक्ती प्रमाणे त्यात बदल अपेक्षित आहेत. बर्‍याचदा मुलगा अभियंता असेल तर मुलगी अभियंताच हवी किंवा   मुलगा डाॅक्टर असेल तर मुलगी
डाॅक्टरच हवी, हे असतंच.
गव्हाळ, सावळा किंवा अगदी काळा मुलाचा पण हट्ट असतो की गोरी मुलगी तेव्हा आपण स्वतःच आपल्या रंगाचा अपमान करतो हे कळत नाही का त्याला?
बरं अनेकांना तर उंचीतही अजिबात तडजोड चालत नाही. आयुष्याचा जोडीदार निवडणं म्हणजे स्वतःच्या उंचीचा कपडा निवडण्यासारखं आहे का अगदी तंतोतंत जुळायला? आणि तसंही उंची जरा कमीजास्त होती म्हणून एकमेकांशी पटलं नाही असं उदाहरण अजून तरी ऐकलेलं नाही.
पुढची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं family status आणि it matters lot.
मुलाच्या घरातल्या मंडळींना आणि बर्‍याचदा मुलांनाही सधन कुटुंबातील मुलगी हवी असते
अगदीच सधन कुटूंब नसले तरीही तुमचं योग्य आदरातिथ्य, मानपान करण्याइतपत तर नक्कीच हवी, असं वाटतं. लग्नसमारंभात सगळं जिथल्या तिथे करणारं, कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू न देणारं प्रसंगी कर्ज काढून हौस पुरवणारं , मुख्य म्हणजे न मागता बरंच काही देणारं (उदा.सोनं, फर्निचर, चांदीची भांडी जमलं तर एखादी चारचाकी,...इत्यादी) कुटुंब हवं असतं. अगदी तोलामोलाचं म्हणजे जगासमोर कौतुकाने सांगता येतं हो, " आम्ही काही मागितले नाही म्हणजे अपेक्षाच नव्हती आमची काही. पण व्याह्यांनी नको म्हणत असतानाही अगदी भरभरुन दिलं".

वरवर आधुनिकतेचा बुरखा पांघरून " आमची काही अपेक्षाच नव्हती" असं म्हणणार्या महाभागांची समाजात कमतरता नाही आणि यात उच्चशिक्षित कुटुंबांचा समावेश आहे हीच समाजाची व्यथा आहे.
याचा अर्थ हाच की शिक्षणाने तुमच्या विचारांची पातळी सुधारते का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
मुलगी उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी करणारी असावी त्या वेळी ती गृहकृत्यदक्ष पण असायलाच हवी अशी अपेक्षा असते पण त्याच वेळी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बर्‍याचदा शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने मुलीला घरापासून दूर राहावे लागते आणि मग त्यामुळे आपोआपच घरकामात मुलींचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे पण पाण्यात पडल्यानंतर चुका करत का होईना पोहायला शिकतोच की प्रत्येक जण. खरचंच या टप्प्यावर प्रत्येक विवाहेच्छुक मुलगा आणि मुलगी यांनी विचार करण्याची गरज आहे " लग्न म्हणजे नेमकं काय? " दोन मने जुळणं, दोन भिन्न परिवार एकत्र येणं,  दोन भिन्न परिस्थितीत वाढलेली माणसं एकत्र नांदणं, दोन परिवारांनी सुखदुःखात एकमेकांना मदत करणं, नव्याने संसार सुरू केलेल्या दोघांना गरज पडल्यास मार्गदर्शन करणं की आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांना एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी फक्त काल्पनिक आहेत का?

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो. आमच्याकडे लग्न टिकतात (की टिकवतात?) आणि घटस्फोटांचं प्रमाण अगदी नगण्य आहे, असं आम्ही अभिमानाने सांगतो पण आज खरंच ही परिस्थिती आहे का?
लग्न ठरवताना माणसांपेक्षा उगीचच अवास्तव गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे.  अवास्तव गोष्टींवर अमाप पैसा खर्च केला जात आहे. आधीच आपल्या समाजात मोठी आर्थिक दरी आहे. मूठभर श्रीमंत माणसे लग्नात भरपूर पैशांची उधळपट्टी करण्यात आणि बाकीचे लोक त्याचे अनुकरण आंधळेपणाने करतात प्रसंगी कर्ज काढून म्हणजे " ऋण काढून सण साजरा करतात".
पण खरंतर या साऱ्या गोष्टींची गरज आहे का? इतके मोठे सोहळे, समारंभ करण्याची गरज आहे का? हेच पैसे एखाद्या सामाजिक कार्यासाठी एखाद्या संस्थेला मदत केली जाऊ शकते.
काही महाभाग यावर असंही म्हणतील की, 'आमचे पैसे आहेत ते आम्ही हवे तसे खर्च करू, तुमचा यावर आक्षेप का?' आता ह्याला काय म्हणावे?
लग्नामध्ये आजकल एका पद्धतीचे जेवण नसते तर निरनिराळ्या पद्धतींचे, सोबतीला आइस्क्रीम, पाणीपुरी नाना प्रकार. किती जेवण वाया जात असेल श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याच्या नादात?
सारासार सोडाच पण थोडाही विचार केला जात नाही या सगळ्यात. आजही आपल्या देशात एक वेळ जगणारे लोक आहेत तसंच उपासमारीने मरणारे पण आहेत. अशावेळी एवढं सगळं अन्न असं एकाच दिवशी  वाया घालवणं किती चुकीचे आहे, याचा विचार केला पाहिजे. किंबहुना आजच्या तरुण पिढीने तो करणं नक्कीच अपेक्षित आहे.
लग्न ठरवताना विशेषतः arrange marriage मध्ये पाहिली जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जात.
कामांची योग्य प्रकारे विभागणी व्हावी, एकाच  प्रकारचे काम अनेकांनी करु नये यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्ण किंवा जाती तयार केल्या पण आजही आम्ही माणूस ही जात विसरून त्यांनाच गोंजारत बसलो आहोत. जन्मलेल्या बाळाला जन्मापासून मरेपर्यंत ही जात नावाची गोष्ट साथ करते, जणूकाही माणसाच्या शरीराचं एक अविभाज्य अंग. म्हणजे भारतात एखादा अवयव नसताना माणूस जगू शकतो पण जातिशिवाय नाही.
मग लग्न ठरवताना तर या गोष्ष्टीला विशेष महत्व आहे. मुलगा किंवा मुलगी ही स्वजातीय असायलाच हवी.
तरीही आजकाल अनेक समंजस माणसांनी यात थोडी तडजोड करायला सुरुवात केली आहे ती म्हणजे "उच्चजातीय" किंवा  "उच्चआंतरजातीय" वधू/वर चालेल. प्रत्येकालाच आपली जात उच्च आहे असंच वाटणार ना? मग उच्चजात कशी आणि कोण ठरवणार? काय निकष लावणार त्यासाठी?  कोण उच्चजातीय किंवा कोण नीचजातीय हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
कुठे जन्म घ्यावा, सधन कुटुंबात की निर्धन, उच्चजातीत की  नीचजातीत, हे कुणाच्या हातात नसतं मग ह्या बाबतीत भेदभाव करण्याचा अधिकारही आपल्याला नाही.
खरचंच विचार करायला हवा, तोही गांभीर्याने. लग्न म्हणजे काय हा प्रश्न पुन्हा पुन्हा सतावतोय मला. दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये उलट या प्रश्नाने अनेक नव्या प्रश्नांना जन्म दिलाय.
लग्न म्हणजे काय?
मनं जुळणं की family status?
भावी आयुष्याचा जोडीदार शोधणं की भविष्याची तरतूद करणारं घराणं?
मनाचं सौंदर्य शोधणं की शरीराचं?
एखाद्याचा रंग पाहून त्याला नाकारणं की एकमेकांच्या रंगात एकरूप होऊन जाणं?
निरपेक्ष प्रेम आणि नातं की अपेक्षांचं अवास्तव ओझं??? 

2 comments:

  1. tuzya wayachya saglyana hach prashna padlay....kharach chan lihilayes....nemkya bhavna...too good Priya!!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद हर्षदा...मला काय वाटतंय ते मांडण्याचा प्रयत्न केलाय.

    ReplyDelete